काँग्रेस पक्षाची विचारसरणीच देशाला प्रगतीच्या दिशेने नेऊ शकते : अविनाश उमरकर अमळनेर काँग्रेस सेवा दलाचे एकदिवसीय शिबिर उत्साहात संपन्न; संघटन बळकटीकरणाचा निर्धार
अमळनेर : जातीयवाद, धर्मांधता, भ्रष्टाचार, आर्थिक विषमता, बेरोजगारी आणि महागाईच्या प्रश्नांमुळे देशासमोर गंभीर आव्हाने उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित कार्य करणारी काँग्रेसची संघटनात्मक ताकदच देशाला योग्य दिशेने नेऊ शकते, असे प्रतिपादन राजीव गांधी पंचायत राज प्रदेश अध्यक्ष श्री. अविनाश उमरकर यांनी केले.
दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी अमळनेर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने प्रा. अशोक पवार यांच्या स्टडी रूममध्ये सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिशा संधान शिव, बापूराव ठाकरे, डी. ए. पाटील आणि संजय पाटील यांनी महात्मा फुले यांच्या विचारांना साजेसे गीत सादर करून वातावरणात उत्साह निर्माण केला.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. अविनाश उमरकर यांनी देशातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले. महात्मा गांधी, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचा आधार घेत लोकशाही, सामाजिक समता आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी संघटितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागतिक बँकेचे माजी अधिकारी व शेतकरी नेते श्री. प्रशांत गावंडे होते. शिबिराचे प्रास्ताविक अमळनेर तालुका काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष श्री. बन्सीलाल भागवत यांनी केले.
यावेळी जिल्हा वक्ता सेल अध्यक्ष संदीप घोरपडे यांनी शिबिरार्थींना संबोधित करताना काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे आणि विविध लोककल्याणकारी भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. तर अमळनेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष बी. के. सूर्यवंशी यांनी काँग्रेस सेवा दलाची भूमिका, कार्यपद्धती आणि संघटनात्मक कार्य याबाबत सविस्तर माहिती दिली.
दुपारच्या सत्रात सर्व शिबिरार्थींनी घरून आणलेले डबे एकत्र करून सहभोजनाचा आनंद घेतला. या उपक्रमातून कार्यकर्त्यांमध्ये आपुलकी आणि एकजुटीचे वातावरण निर्माण झाले.
अध्यक्षीय भाषणात श्री. प्रशांत गावंडे यांनी काँग्रेसने स्वातंत्र्यपूर्व काळात केलेला संघर्ष तसेच स्वातंत्र्यानंतर देशाच्या विकासात दिलेले योगदान जनतेसमोर प्रभावीपणे मांडण्याची गरज व्यक्त केली. तसेच सत्ताधाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने जाब विचारत राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रा. अशोक पवार यांनी ‘संघटन’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. अमळनेर तालुक्यातील १०० गावांमध्ये काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सक्षम कार्यकर्त्यांची फळी उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.
या शिबिरात भिकाजी पाटील, मनोज पाटील, मनोहर सूर्यवंशी, कन्हैयाला कापडे, गजेंद्र साळुंखे, मोतीलाल जाधव, रोहिदास कापडे, पार्थराज पाटील, कल्पना महिरे, मगन पाटील, सुधाकर भैसे, प्रकाश सोनवणे, शालिग्राम पाटील, रामकृष्ण पाटील, विकास पाटील, महेश पाटील, पी. वाय. पाटील, दिनेश पवार, राकेश पवार, सदाशिव पवार, कौस्तुभ पाटील, भगवान संधान शिव, अमित पवार, खंडेराव न्हावी, बापूराव पाटील, गोविंदा पाटील यांच्यासह जवळपास ५० शिबिरार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
शिबिराच्या माध्यमातून काँग्रेस सेवा दलाच्या संघटनात्मक विस्तारासह अमळनेर तालुक्यात गावागावांत कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभारण्याचा निर्धार करण्यात आला.
