अमळनेरमध्ये बालविवाह रोखण्यासाठी व्यापक सतर्कता अभियान
अमळनेर (जि. जळगाव) – अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी अमळनेर येथे महत्त्वपूर्ण सतर्कता अभियान राबविण्यात आले. जिल्हाधिकारी रोहन घुगे व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलीस स्टेशन, आधार बहुउद्देशीय संस्था आणि पुरोहित संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समितीच्या साने गुरुजी सभागृहात बैठक पार पडली.
या बैठकीत अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या विवाहांमध्ये मुला-मुलींचे वय काटेकोरपणे पडताळण्याचे आवाहन करण्यात आले. विवाहापूर्वी आधार कार्ड, शाळेचा दाखला व जन्मदाखला तपासूनच मुहूर्त देण्याची जबाबदारी धर्मगुरू व पुरोहितांनी पार पाडावी, असे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी अमळनेर पोलीस स्टेशनच्या पीएसआय कविता ठाणगे यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच पॉक्सो (POCSO) कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. बालविवाह घडवून आणणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी दिला. पोलीस कॉन्स्टेबल शामल पारधी यांचीही उपस्थिती होती.
आधार बहुउद्देशीय संस्थेच्या संचालक रेणू प्रसाद यांनी बालविवाहासोबतच बाल तस्करी, लैंगिक शोषण आणि बालमजुरी यांसारख्या गंभीर समस्यांवर मार्गदर्शन केले. या अभियानाचा विस्तार संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे करण्याबाबत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीला आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील, प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, मोहिनी धनगर, दीपक विश्वेश्वर, उर्जिता शिसोदे, दीप्ती गायकवाड, अश्विनी भदाणे, भावना सूर्यवंशी आदींसह पुरोहित संघाचे निलेश जोशी, श्रीकांत पाठक, हरिश्चंद्र जोशी, प्रफुल जोशी, अरविंद नाईक, अक्षय नाईक, ज्ञानेश्वर भावे, प्रदीप कुमार जोशी, प्रशांत जोशी, महेश कुलकर्णी, नंदकुमार जहांगीदार, सुनील जोशी, सारंग गर्गे व मंगेश काळकर उपस्थित होते.
बालविवाहमुक्त समाज घडविण्यासाठी प्रशासन, पोलीस, सामाजिक संस्था आणि धर्मगुरू यांनी एकत्रितपणे घेतलेला हा पुढाकार महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
