ब्रेकिंग
अमळनेरात आखाजी महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद; अहिराणी संस्कृतीच्या जतनासाठी शासकीय पाठबळाची गरज – राजेश पांडे

 

अमळनेर : खान्देशाची ओळख असलेल्या आखाजी महोत्सवाने यंदा अमळनेरात अभूतपूर्व उत्साहात रंगत घेतली. अहिराणी संस्कृतीतील गौराई, झोक्यावरची गाणी, जात्यावरची गाणी अशा पारंपरिक रूढी-परंपरांचे जतन व संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी केले. या महोत्सवाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता हा उपक्रम शासकीय स्तरावर आणि मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

खान्देश साहित्य संघाच्या वतीने अमळनेर येथील एलआयसी कॉलनीत आयोजित पहिल्या आखाजी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी होते.

राजेश पांडे पुढे म्हणाले, “अमळनेर सोडून ३८ वर्षे झाली असली तरी अहिराणी भाषेची गोडी अजूनही तितकीच आहे. त्यामुळेच मी आज अहिराणीतून संवाद साधत आहे. आधुनिक युगातही महिलांनी या परंपरा जपल्या पाहिजेत, ही काळाची गरज आहे.”

यावेळी आमदार अनिल पाटील यांनी महिलांनी परंपरा जतन केल्याबद्दल अभिमान व्यक्त केला, तर माजी आमदार साहेबराव पाटील यांनी अहिराणीतील फटकेबाजीने उपस्थितांचे मनोरंजन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष शरद धनगर यांनी केले, तर स्वागतपर भाषण स्वागताध्यक्ष तथा कृउबा सभापती अशोक आधार पाटील यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य संघाचे सचिव रमेश बोरसे, खजिनदार प्राचार्या रत्नाताई पाटील, जेष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील, कवी हिरामण कंखरे, गोकुळ बागुल, शाहीर नाना पाटील, भाऊसाहेब देशमुख, जयवंतराव पाटील, डॉ. अनिल शिंदे, दिनेश नाईक, एल.टी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सभापती अशोक पाटील, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, ऍड. व्ही.आर. पाटील, माजी नगरसेवक विक्रांत पाटील, डॉ. अविनाश जोशी, डॉ. डिगंबर महाले, सचिन पाटील, अमेय मुंदडा, रिता बाविस्कर, राजू फपोरेकर, ज्ञानेश्वर धनगर, जयेशकुमार काटे आदींचे सहकार्य लाभले.

महोत्सवात पारंपरिक पद्धतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. पुरणपोळी स्पर्धेत प्रतिभा चौधरी प्रथम, नयना पाटील द्वितीय, तर मंगल सोनवणे तृतीय ठरल्या. झोक्यावरच्या गाण्यांमध्ये मेघना पवार व दीपिका पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. उखाणे वेशभूषा स्पर्धेत विजयाताई पाटील प्रथम ठरल्या. आरास स्पर्धेत जिजाऊ ग्रुपने बाजी मारली.

घट्यावरच्या गाण्यात रंजना महाजन प्रथम, तर चित्रकला स्पर्धेत आशा दुसाने व लता दुसाने यांनी द्वितीय, श्यामल पाटील व कल्पना देवरे यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

स्पर्धांचे परीक्षक म्हणून वसुंधरा लांडगे, प्रा. शीला पाटील, लीना पाटील, सुरेखा बाविस्कर, दर्शना पवार, बोरकर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन संजय पाटील व पूनम बेडसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उमेश काटे यांनी केले.

अमळनेरात पहिल्यांदाच भरलेल्या या आखाजी महोत्सवाने अहिराणी संस्कृतीच्या जतनासाठी नवा आदर्श निर्माण केला असून, भविष्यात हा महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात साजरा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

test