ब्रेकिंग
बालविवाह निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवसाची घोषणा संयुक्त राष्ट्र संघाकडून बालविवाह निर्मूलनासाठी ऐतिहासिक जागतिक दिनाची घोषणा;  आधार बहुउद्देशीय संस्थेकडून स्वागत २७ नोव्हेंबर हा दिवस ‘बाल, अल्पवयीन आणि सक्तीच्या विवाह निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून घोषित

 

अमळनेर, जि. जळगाव | 

५ सप्टेंबर २०२६ : 

संयुक्त राष्ट्रसंघाने २७ नोव्हेंबर हा दिवस ‘बाल, अल्पवयीन आणि सक्तीच्या विवाह निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून घोषित केल्याच्या ऐतिहासिक निर्णयाचे आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांनी स्वागत केले आहे.

जळगाव जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनासाठी तळागाळात जनजागृती व प्रतिबंधात्मक कार्य करणारी आधार बहुउद्देशीय संस्था ही Just Rights for Children (JRC) या बालहक्कांसाठी कार्यरत असलेल्या देशातील प्रमुख संस्थांच्या नेटवर्कची भागीदार संस्था आहे. बालविवाह निर्मूलनासाठी स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दिवस घोषित करण्याच्या JRC च्या दीर्घकालीन अभियानाला या निर्णयामुळे जागतिक स्तरावर ऐतिहासिक मान्यता मिळाल्याचे संस्थेने म्हटले आहे.

आधार बहुउद्देशीय संस्थेच्या प्रतिनिधी डॉ. भारती पाटील, रेणू प्रसाद आणि प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे यांनी या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले. “भारतातून निर्माण झालेला बालविवाह निर्मूलनाचा आवाज आज जागतिक संकल्प बनला आहे. आपल्या देशातील आणि तळागाळातील कार्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे,” असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “२७ नोव्हेंबर हा दिवस जागतिक स्तरावर बालविवाह निर्मूलनासाठी समर्पित करण्याचा निर्णय भारतासाठी विशेष अभिमानाचा आहे. याच दिवशी २०२४ मध्ये भारत सरकारने JRC आणि त्याच्या भागीदार संस्थांच्या सहकार्याने ‘बाल विवाह मुक्त भारत’ अभियानाची सुरुवात केली होती. मात्र, हा केवळ उत्सव साजरा करून थांबण्याचा क्षण नसून आपली जबाबदारी अधिक दृढ करण्याची वेळ आहे.”

तळागाळातील संघर्ष सुरूच राहणार

जागतिक स्तरावरील या संकल्पाचे रूपांतर गावपातळीवरील प्रत्यक्ष कृतीमध्ये करणे हे आता प्रमुख आव्हान असल्याचे संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले. “जिल्ह्यातील कोणत्याही गावात एखादे मूल बालविवाहाच्या धोक्यात असेपर्यंत आमचा संघर्ष अपूर्ण आहे. केवळ कायदे करून बालविवाह पूर्णपणे थांबविता येणार नाहीत. त्यामुळे शाळा, ग्रामपंचायती आणि गावांमध्ये व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे,” असे त्यांनी सांगितले.

संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना बालविवाह विरोधी प्रतिज्ञा घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व बाल विवाहाच्या जोखमीतील कुटुंबांना विविध शासकीय योजनांशी जोडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तसेच शिक्षणातून बाहेर पडलेल्या मुला-मुलींना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.

आधार बहुउद्देशीय संस्थेने जळगाव जिल्ह्यात प्रशासन, कायदा अंमलबजावणी यंत्रणा आणि स्थानिक समुदायांच्या सहकार्याने बालविवाह प्रतिबंधासाठी सातत्याने कार्य केले असून, अनेक प्रकरणांमध्ये सामाजिक व कायदेशीर हस्तक्षेप करण्यात आले आहेत.

जागतिक अभियानाची ऐतिहासिक वाटचाल

Just Rights for Children चे संस्थापक भुवन ऋभू यांनी बालविवाह निर्मूलनासाठी स्वतंत्र जागतिक दिवसाची मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने मांडली. मार्च २०२६ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघातील आपल्या भाषणात त्यांनी या मागणीचा पुनरुच्चार केला. सिएरा लिओनच्या फर्स्ट लेडी डॉ. फातिमा मादा बायो यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला.

त्यानंतर सिएरा लिओनने भारतासह सुमारे ५० देशांच्या पाठिंब्याने संयुक्त राष्ट्रांच्या महासभे समोर २७ नोव्हेंबर हा दिवस बालविवाह निर्मूलनासाठी जागतिक दिवस म्हणून घोषित करण्याचा ठराव सादर केला. ४ सप्टेंबर २०२६ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने हा ऐतिहासिक ठराव मंजूर केला.

भारतातील व्यापक जनआंदोलन

JRC हे जगातील मोठ्या बाल संरक्षण नेटवर्कपैकी एक असून, ‘Child Marriage Free World’ अभियानांतर्गत जागतिक स्तरावर बाल विवाहाविरोधात व्यापक चळवळ उभारण्यासाठी कार्यरत आहे.

भारतात JRC च्या भागीदार संस्था विविध राज्यांमध्ये आणि देशातील ७८२ जिल्ह्यांमध्ये शासन व प्रशासनाच्या सहकार्याने कार्यरत आहेत. समुदाय, शाळा, ग्रामपंचायती, आदिवासी व वंचित समाजघटक, महिला, पोलीस कर्मचारी, धार्मिक नेते आणि लोकप्रतिनिधींना या अभियानात सहभागी करून बाल विवाहाविरोधात व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.

JRC च्या माहितीनुसार, या सामूहिक प्रयत्नांमुळे भारतात ५ लाख ५० हजारांहून अधिक बालविवाह रोखण्यात योगदान मिळाले असून, लाखो नागरिकांनी बाल विवाहाविरोधी प्रतिज्ञा घेतल्या आहेत.

बालविवाह निर्मूलनासाठी करण्यात आलेली ही जागतिक बांधिलकी संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास उद्दिष्ट क्रमांक ५ – लैंगिक समानता (SDG-5) मधील लक्ष्य ५.३ शी सुसंगत आहे. या उद्दिष्टानुसार बालविवाह, अल्पवयीन विवाह आणि सक्तीच्या विवाहासह सर्व प्रकारच्या हानिकारक प्रथांचे निर्मूलन करण्याचे जागतिक लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

आधार बहुउद्देशीय संस्थेने सर्व नागरिक, पालक, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, युवक, महिला, सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणांना बाल विवाहमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले आहे.

“प्रत्येक बालकाला शिक्षण, सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. बाल विवाहमुक्त भारत आणि बाल विवाहमुक्त जग निर्माण करण्यासाठी आता जागतिक संकल्पाला स्थानिक कृतीची जोड देणे आवश्यक आहे,” असे संस्थेने म्हटले आहे.

या प्रसंगी आधार बहुउद्देशीय संस्थेचे आनंद पगारे, मोहिनी धनगर आणि सुनील हिवाळे उपस्थित होते.

— आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर

जिल्हा जळगाव, महाराष्ट्र

Just Rights for Children (JRC) भागीदार संस्था

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *