प्रताप महाविद्यालयात पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन (१६ व १७ सप्टेंबरला रंगणार राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा; विजेत्यांना आकर्षक पारितोषिकांसह चषक)
अमळनेर, प्रतिनिधी: खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धा दिनांक १६ व १७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. अशी घोषणा महाविद्यालयाच्या CCMC विभागाचे प्रमुख डॉ. धनंजय चौधरी यांनी केली आहे. महाविद्यालयाच्या पूज्य साने गुरुजी सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत दोन दिवस ही स्पर्धा रंगणार आहे.
या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी विविध ज्ञानशाखांचा समावेश असलेला व्यापक अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यामध्ये साहित्य व कला, भारताचा इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान व आरोग्य, महाराष्ट्रातील समाजसुधारक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार व त्यांचे स्वरूप, भारतीय अर्थव्यवस्था, क्रीडा, पर्यावरण, राज्यव्यवस्था व शासन, वाणिज्य, माहितीचा अधिकार, विज्ञान व तंत्रज्ञान, मानव संसाधन विकास व मानवी हक्क, चालू घडामोडी, कृषी, पूज्य साने गुरुजी तसेच इतर समाजसुधारक या विषयांचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानाबरोबरच विविध विषयांवरील आकलन, तर्कशक्ती, चिकित्सक विचार आणि तत्परता यांचीही कसोटी लागणार आहे. या स्पर्धेच्या तीन फेऱ्या होणार असून पहिल्या फेरीत सामान्य ज्ञानावर प्रश्न विचारले जातील, दुसऱ्या फेरीत ऑडिओ व्हिडिओ प्रश्नांची बझर फेरी होईल. तर तिसऱ्या व अंतिम फेरीत पूज्य. सानेगुरुजी व अन्य समाज सुधारकांवर प्रश्न विचारले जातील अंतिम फेरीत यशस्वी झालेल्या संघांना पारितोषिके दिले जातील.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकास १०,००० रुपये व चषक, द्वितीय क्रमांकास ७,००० रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकास ५,००० रुपये व चषक देण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक २,००० रुपये व चषक आणि उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक १,००० रुपये व चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील या स्पर्धेचे समन्वयक डॉ. किरण गावित, तर सह-समन्वयक प्रा. भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे संयोजन करण्यात येणार आहे. पूज्य साने गुरुजी यांच्या विचारांचा, साहित्याचा आणि सामाजिक कार्याचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा, तसेच विद्यार्थ्यांमध्ये व्यापक वाचन, सामाजिक भान आणि विविध विषयांचे ज्ञान विकसित व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेला महाराष्ट्रातील महाविद्यालयांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
खानदेश शिक्षण मंडळाच्या सर्व संचालक मंडळाने या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेला शुभेच्छा दिल्या असून प्रताप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष समन्वयक डॉ. मुकेश भोळे, CCMC विभागाचे माजी समन्वयक डॉ. विजय तुंटे, सध्याचे CCMC समन्वयक डॉ. धनंजय चौधरी, सह-समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेला शुभेच्छा दिल्या असून महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थी स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. प्रस्तुत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांचे सर्व सदस्य तन्मयतेने सहकार्य करीत आहेत.


