औरंगाबादः दिवाळी तोंडावर असतानाच महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आहे. मात्र राज्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी यावर सडकून टीका केली आहे. दिवाळीत अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतीचं नुकसान झालंय. सोयाबीन गेलं.. काहीच नाही राहिलं… हे सरकार काय करतं माहिती नाही. आमचे इथले एक शेती मंत्री आहेत. ते म्हणाले, आणेवारी नाही काढायची, ओला दुष्काळ जाहीर करायचा नाही… जसं की यांच्या खिशातून पैसे चाललेत का, असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी केला. या लोकांना आमदारांना खोके देता, शेतकऱ्यांना पेट्या तर द्या. हे नाहीच होते… आजपासून दिवाळी सुरु झाली आहे आणि शेतकऱ्यांना काहीच नाही? ही चुकीची गोष्ट असल्याचं खैरे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांनी काल मनसेच्या एका कार्यक्रमात उपस्थिती लावली. त्यामुळे राज ठाकरे शिंदे-फडणवीसांसोबत आगामी निवडणुकांत लढतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
चंद्रकांत खैरे यांनी या विषयावर सडेतोड प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे एवढे मजबूत आहेत की, त्यांना याची काहीही पर्वा नाही. बाळासाहेब ठाकरे आणि जनतेचा आशीर्वाद उद्धव ठाकरे यांना आहे. या तिघांचं रोज काहीतरी चालंलंय. पण तेही ठाकरेच आहेत. हे दोघं त्यांना कितपत मदत करतील…. या दोघांना लहर आली की ते काहीपण करतील, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलंय.
तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भीतीमुळे, दहशतीमुळेच हे तिघे महायुतीत एकत्र आले आहेत, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केलंय