अमळनेर तालुक्यात उष्णतेचा कहर पाच जणांचा उष्माघाताने मृत्यू : प्रशासन सतर्क
अमळनेर ( प्रतिनिधी) तालुक्यात उष्णतेचा कहर वाढला असून तापमान वाढल्यामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असून दोन-तीन दिवसात पाच नागरिकांचा मृत्यू झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन उष्माघात कक्षाची पाहणी केली. याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 12 रोजी तीव्र उष्णतेमुळे चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 13 मे रोजी बस स्थानक परिसरात बहादरपूर येथील पुजारी प्रभाकर जोशी यांचा उष्णतेच्या तीव्रतेमुळे मृत्यू झाल्याच्या समोर आले होते.
ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली असून शीत खोली, कुलर, थंड पाणी, तापमान मापक यंत्रणा, ओ आर एस, सलाईन, आईस पॅड तसेच कोल्ड स्पंजिंग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. उष्माघाताच्या रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी 24 तास डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी सेवेत ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुपारी बारा ते चार या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. पुरेसे पाणी प्यावे, तसेच डोक्यावर रुमाल बांधावा. लहान मुले आणि वृद्ध नागरिकांची अधिक काळजी घेण्याच्या सूचना प्रांतधिकारी मयूर भंगाळे यांनी दिल्या आहेत.
