शेतकी संघाच्या निवडणुकीत 15 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात. बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न अयशस्वी
अमळनेर ( प्रतिनिधी) येथील तालुका शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत एकूण 155 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते. दिनांक 20 मे रोजी माघारीच्या अखेरच्या दिवशी 111 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले त्यामुळे आता अंतिम चित्र स्पष्ट होऊन 30 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत 44 उमेदवार रिंगणात आहेत.
दरम्यान शेतकी संघ ही सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या फारसे भक्कम नसल्याने निवडणुकीचा भुर्दंड संस्थेवर नको असे काही नेत्यांचे म्हणणे होते. त्यासाठी बिनविरोध निवडणूक होणे गरजेचे होते. मात्र बिनविरोध चा प्रयत्न यशस्वी झाल्याने आता निवडणुकीची रणधुमाळी माजणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही निवडणूक होत असल्याने ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरणार आहे.

आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वात सहकार पॅनल असून यात संपूर्ण 15 उमेदवारांचा समावेश आहे. तर खासदार स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखाली किसान विकास पॅनल गठीत झाले असून या चौदा उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय काँग्रेस पक्षाने शेतकरी पॅनल जाहीर केले असून त्यांनी सोसायटी मतदार संघात एकही उमेदवार दिला नसून अन्य जागांवर दहा उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.
या निवडणुकीत खासदार आणि आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

