कर्तबगार महिलांचा सन्मान यावर्षी तरी होणार का? दोन वर्षांपासून रखडलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार तातडीने वितरित करण्याची मागणी
प्रतिनिधी | अमळनेर
ग्रामीण भागातील कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानासाठी सुरू करण्यात आलेला *“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार”* गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याने महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यावर्षी तरी रखडलेले सर्व पुरस्कार थाटामाटात वितरित करून ग्रामीण महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी खानदेश साहित्य संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी. ए. धनगर यांनी केली आहे.
महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने 9 मे 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत व गटपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांचा *31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त* सन्मान करण्याचे निश्चित करण्यात आले होते.
या पुरस्कारांतर्गत महिलांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि प्रति महिला 500 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येत होते. 31 मे 2023 रोजी राज्यभरातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये महिलांचा गौरवही करण्यात आला होता. मात्र त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे पुढील दोन वर्षांचे पुरस्कार रखडले.
विशेष म्हणजे आचारसंहिता संपल्यानंतरही शासनाने या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. रखडलेल्या पुरस्कारांचे वितरण न झाल्याने हजारो ग्रामीण महिलांवर अन्याय झाला असून शासन निर्णयाचाही अनादर झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

डी. ए. धनगर यांनी म्हटले आहे की, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी आपण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजऱ्या करतो. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान होणेही तितकेच आवश्यक आहे.
यावर्षी तरी 2024, 2025 आणि 2026 या तीन वर्षांचे मिळून प्रत्येकी दोन अशा एकूण सहा कर्तबगार महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यातील हजारो ग्रामपंचायतींसाठी हा महत्त्वाचा प्रश्न बनला असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

