ब्रेकिंग
धार–मालपूर रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते संपन्न

 

तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत धार ते मालपूर या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पडला. आमदार निधी अंतर्गत मंजूर झालेल्या ₹२५ लाखांच्या निधीतून होणाऱ्या या कामाचा शुभारंभ माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाल्याने धार व मालपूर परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः पावसाळ्यात चिखल व खड्ड्यांमुळे होणारी गैरसोय, वाहतुकीतील अडथळे आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आता दूर होणार असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा मजबूत करणे हे आमचे प्राधान्य आहे. रस्ते, पाणी व वीज या सुविधा सक्षम केल्याशिवाय खऱ्या अर्थाने विकास साध्य होत नाही. धार–मालपूर रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील नागरिकांना वर्षभर सुलभ व सुरक्षित प्रवास करता येईल.”

या समारंभास धार व मालपूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महायुतीचे कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

ग्रामस्थांच्या वतीने आमदार पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले. गावाच्या विकासाच्या दिशेने उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार असून भविष्यातही अशा विकासकामांना प्राधान्य देण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

सदर रस्ता पूर्ण झाल्यानंतर परिसरातील शेती उत्पादनांची वाहतूक सुलभ होणार असून शिक्षण, आरोग्य व दैनंदिन व्यवहारांसाठी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. परिणामी, धार व मालपूर परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे शॉर्टसर्किटमुळे शेतीचे झाले नुकसान

 

अमळनेर – तालुक्यातील टाकरखेडा येथे आज दि १७ रोजी दुपारी २ ते २.३० दरम्यान शॉटसर्किट मुळे सुमारे साडेतीन बिघे जमिनीवरील मक्याला आग लागून सुमारे दिड लाखाचे नुकसान झाले आहे.

              टाकरखेडा येथील शेतकरी कैलास आत्माराम पाटील यांच्या साडेतीन बिघे शेतातील मका दुपारी शॉट सर्किट मुळे जळून खाक झाला आहे त्या ठिकाणी शेतकरी नितीन कैलास पाटील,अमोल संजय पाटील, सतीश सुरेश पाटील,मनोहर विश्वास पाटील,संजय शिवाजी पाटील आदींनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला.त्यानंतर महावितरण कंपनीचे सखाराम भिल,पंकज पाटील,तलाठी प्रफुल्ल पाटील,कृषिसहाय्यक श्री. सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली व नुकसानीचे फोटो काढले.

               सदर घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन त्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी शेतकरी कैलास पाटील व गावकऱ्यांनी केली आहे.

आमदार अनिल पाटील यांनी घेतला शेत पानंद रस्त्यांच्या कामांचा सखोल आढावा

 

टँकर मागणीच्या प्रस्तावांना चारच मंजुरी द्या-आमदारांचे आढावा बैठकीत निर्देश

अमळनेर:-तालुक्यातील विकासकामांना गती देण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना अंतर्गत महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली.

        या बैठकीत आमदारांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पानंद रस्त्यांच्या कामांचा सखोल आढावा घेतला. तसेच आगामी उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या परिस्थितीवरही गांभीर्याने चर्चा करण्यात आली. नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले. विशेषतः टँकर मागणी संदर्भात प्राप्त झालेल्या तसेच येणाऱ्या सर्व प्रस्तावांना केवळ चार दिवसांच्या आत मंजुरी देण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना देत प्रशासनाला गती देण्यावर भर देण्यात आला. यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.

      सदर बैठकीत विविध विभागांचे अधिकारी,उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी, बांधकाम, भूमी अभिलेख, पोलीस प्रशासन तसेच पंचायत समितीचे अधिकारी यांनी आपापल्या विभागाचा आढावा सादर केला.समन्वयातून कामे जलदगतीने पूर्ण करण्यावर सर्वांनी एकमत व्यक्त केले. तसेच समिती सदस्य व ग्रामस्थ प्रतिनिधी आपल्या भागातील अडचणी मांडल्या, त्यावर आमदारांनी सकारात्मक भूमिका घेत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

        ही बैठक म्हणजे केवळ आढावा नव्हे, तर शेतकरी व ग्रामीण विकासासाठी घेतलेली ठोस दिशा देणारी पावले असल्याचे स्पष्ट झाले.

        सदर बैठकीत मयूर भंगाळे (उपविभागीय अधिकारी अमळनेर), रुपेश कुमार सुराणा (तहसीलदार अमळनेर), डॉ.उल्हास देवरे (तहसीलदार पारोळा), एन.आर पाटील (गटविकास अधिकारी अमळनेर), विजयकुमार देवरे (उपअधीक्षक भूमी अभिलेख पारोळा), भूषण कदम (गटविकास अधिकारी पारोळा), नीना बाविस्कर (सा.का अधिकारी पारोळा), वैशाली जडे (शाखा अभियंता पंचायत समिती पारोळा), आकाश भाई (ए.पी.ओ पंचायत समिती पारोळा), एस.एस खर्डे (विस्तार आधिकारी पंचायत समिती अमळनेर), डी.जी जाधव (मं.कं अ पारोळा), प्रकाश चव्हाण (पोलीस उपनिरीक्षक अमळनेर- एस डी पी ओ कार्यालय), महेश जाधव (सहायक म.अधिकारी पारोळा), ए.जे.परदेशी (सहाय्यक म. अधिकारी अमळनेर), जितेंद्र बुवा (ए.पी ओ रोजगार हमी योजना पारोळा), वाय.ए.वंजारी (उप कृषी अधिकारी अमळनेर), ए.आर कोठावदे (उप कृषी अधिकारी अमळनेर ), एस.पी.गावित (उपअधीक्षक भूमी अभिलेख अमळनेर), एस.बी.देसले (आर.एफ.ओ पारोळा), एम.डी चव्हाण (एच.क्यू.ए), एच.के.पाटील (उपअभियंता बां.वि. जिल्हा परिषद अमळनेर), पी.ए.पाटील (उपविभागीय सनियंत्रण अधिकारी सा.बां.), गांगुर्डे साहेब (उपविभागीय सनियंत्रण अधिकारी सा.बां.), एस.व्हि.पाटील (ज्युनिअर इंजिनिअर पीडब्ल्यूडी पारोळा) इत्यादी अधिकारी वर्गासह अनिल सिसोदे (समिती सदस्य), रिता बाविस्कर (समिती सदस्य), गौरव उदय पाटील (समिती सदस्य), चेतन काशिनाथ पाटील (समिती सदस्य), महारु आत्माराम पाटील (ग्रामस्थ), सुरेश देवचंद पाटील (ग्रामस्थ), ललित भूपेंद्र बाविस्कर (ग्रामस्थ) आदी उपस्थित होते.

      दरम्यान शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पाणी टंचाईवर मात आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ही बैठक अत्यंत फलदायी ठरली.

ॲड. ललिता पाटील स्कूलची दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत १००% निकालाची परंपरा कायम

 

शाळेची विद्यार्थिनी अक्षरा भामरे ९८.२०% मिळवत अमळनेर- पारोळा विभागात प्रथम तर जिल्ह्यात पाचवी

प्रतिनिधी | अमळनेर 

              येथील ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा २०२५-२६ निकाल शंभर टक्के (१००% ) लागला.माध्यमिक विभागातून अक्षरा भामरे हिने ९८.२०% मिळवत सीबीएसई बोर्डाच्या परिक्षेत अमळनेर-पारोळा विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यासह इयत्ता दहावीच्या निकालात पुढील ५ विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले. पलक पाटील ९६.४०% मोहित पवार ९५.२०% नैतिक सेनानी ९५.२०% व वैष्णवी माळी ९४.४०% मिळवत प्रथम पाच मध्ये येण्याचा मान पटकावला आहे. 

        अक्षरा हिने इंग्लिश आणि माहिती तंत्रज्ञानात १०० पैकी १०० तर पलक पाटील हिने मराठीत १०० पैकी १०० गुण मिळवले. यावर्षी देखील सीबीएसई माध्यमिक विभागात शाळेने पंचक्रोशीत १००% निकालाची परंपरा कायम राखली असून इयत्ता दहावीच्या निकालात नेत्रदीपक गुण मिळवुन घवघवीत यश संपादन केले. परीक्षेत एकूण १०५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विद्यार्थ्यांच्या यशात सर्व विषय शिक्षकांसह इतर सर्व शिक्षकांनी देखील मेहनत घेतली असून विद्यार्थ्यांच्या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा ॲड.ललिता पाटील, सचिव प्रा.श्याम पाटील संचालक पराग पाटील व प्रा देवेश्री आणि प्राचार्य डॉ.नीरज चव्हाण यांनी कौतुक व अभिनंदन केले.

१०० टक्के निकालासहित स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता दहावीच्या सीबीएसई परीक्षेत दबदबा कायम.

 

– शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये मार्च महिन्यात झालेल्या दहावीच्या सीबीएसई परीक्षेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचे नाव उंचावले आहे. यंदाच्या निकालात विद्यार्थ्यांनी उज्ज्वल कामगिरी करत गुणवत्तेची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

या परीक्षेत सिद्धी भानुदास पाटील हिने 96.6% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. चैतन्य वारके हिने 96.2% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर निशा पाटील व मानसी पाटील यांनी प्रत्येकी 95.8% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.

शाळेच्या एकूण 40 विद्यार्थ्यांपैकी 11 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळवले असून 19 विद्यार्थ्यांनी 85% पेक्षा जास्त गुण मिळवत मिळवले आहे. तसेच सर्व विद्यार्थी हे विशेष प्राविण्यसहित उत्कृष्ट श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावला आहे.

या यशाबद्दल शाळेचे मार्गदर्शक श्री बजरंग जी अग्रवाल, संस्थापक अध्यक्ष नीरज अग्रवाल, अध्यक्षा सौ सीतिका अग्रवाल, व्यवस्थापन सदस्या ममता अग्रवाल, आचल अग्रवाल, चेअरमन डी डी पाटील सर, मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. शाळेतील शिक्षकांनी नियमित सराव परीक्षा व मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची भक्कम तयारी करून घेतल्यामुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.

पालकांनीही शाळेच्या शैक्षणिक पद्धतीचे व शिक्षकांच्या मेहनतीचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

या घवघवीत निकालामुळे स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अमळनेर मध्ये पुन्हा एकदा धुरंदर ठरले आहे.

युवा कल्याण प्रतिष्ठानने केला महापुरुषांच्या विचारांचा जागर

 

महात्मा ज्योतिराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने युवा कल्याण प्रतिष्ठान,अमळनेर ने वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. वकृत्व स्पर्धेचे विषय होते (एक) महात्मा ज्योतिराव फुले जीवन व कार्य (दोन) डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन व कार्य. स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 1000 रुपयांचे तर द्वितीय 750 व तृतीय 500 शिवाय प्रमाणपत्र. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा डॉ लीलाधर पाटील, प्रा डॉ राहुल निकम, अशोक बिऱ्हाडे यांनी काम पाहिले. महापुरुषांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी युवा वक्ते तयार व्हावेत म्हणून सदर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत प्रथम क्रमांक अखिलेश मनोज पाटील,द्वितीय क्रमांक सायली योगराज पाटील तर तृतीय क्रमांक पल्लवी रामकृष्ण पाटील यांनी पटकावला.स्पर्धेच्या बक्षिसाचे प्रायोजकत्व अनुक्रमे शाम जयंतराव पाटील, वंदना ठेंग व चिंधु वानखेडे यांनी स्वीकारले होते. विजेत्या स्पर्धकांना गोकुळ पाटील( माजी केंद्रप्रमुख) हरिश्चंद्र कढरे, प्रा अशोक पवार,दयाराम पाटील,बापूराव ठाकरे यांच्या हस्ते बक्षिसांचे व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हृदयनाथ मोरे, मिलिंद निकम, संजय पाटील आदींनी परिश्रम घेतले. स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सदर कार्यक्रम विठ्ठल नगर येथील अभ्यासकेत सपन्न झाला 

कन्हेरेत भूमीमाता पूजनातून सेंद्रिय शेतीचा जागर; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 

अमळनेर : तालुक्यातील कन्हेरे येथे भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियानाच्या जनजागर रथाचे आगमन होताच शेतकरी बांधवांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद देत भूमीमाता पूजनाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे बहुमोल सहकार्य लाभले.

बुधवार, दि. १५ एप्रिल रोजी सकाळी चिंचदेवी मंदिराच्या सभामंडपात आयोजित कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत अरुण नेरकर यांच्या हस्ते विधिवत भूमीमातेचे पूजन करण्यात आले. विविध गावांतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील माती आणून एकत्रित पूजन केल्याने कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक व सामाजिक रंग प्राप्त झाला.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रफुल्ल पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी राजेश बोरसे, उप कृषी अधिकारी दिनेश पाटील, ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक भूषण पाटील, मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, मनोहर तायडे, तसेच मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी, गणेश जोशी आणि सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सुबोध पाटील यांनी भूमी सुपोषण चळवळीची पार्श्वभूमी स्पष्ट करत सेंद्रिय शेतीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विविध गावांमधून संकलित मातीचे एकत्र पूजन करण्यात आले.

कृषी अधिकारी प्रफुल्ल पाटील यांनी रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे शेती, शेतकरी व पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देत सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. भूषण पाटील यांनी निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, ट्रायकोडर्मा, रायझोबियम व बीज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. तसेच शासनाच्या विविध जैविक शेती उपक्रमांची माहितीही शेतकऱ्यांना देण्यात आली.

या अभियानांतर्गत जनजागर रथाने कन्हेरेसह फापोरे बुद्रुक, हिंगोणे खुर्द, सडावण बुद्रुक, कोळपिंप्री या गावांनाही भेट देत शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीबाबत जागर निर्माण केला. ध्वनिक्षेपकाद्वारे माहिती प्रसारित करत, पत्रके वाटप करून आणि शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करत या अभियानाला व्यापक प्रतिसाद मिळाला.

भूमीमातेच्या संवर्धनासाठी आणि शाश्वत शेतीसाठी सेंद्रिय पद्धतीचा स्वीकार करणे काळाची गरज असल्याचा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

 

अमळनेर : प्रबुद्ध विहार, अमळनेर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक नेते श्री. मनोहर नाना निकम यांच्या शुभहस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला खौशी येथील अरुण बापू देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे तालुका अध्यक्ष डी. एम. पाटील, सेवानिवृत्त शिक्षक व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त चिंधू दादा वानखेडे, तसेच संजय सूर्यवंशी (पारोळा) आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही एका पक्षाचे किंवा व्यक्तीचे नव्हते, तर ते सर्वसामान्य जनतेचे नेते होते. मानवता, समता आणि बंधुभाव यांचा संदेश त्यांनी समाजाला दिला असून त्यांच्या विचारांवरच देशाची वाटचाल सुरू आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी या महान महामानवाला कोटी कोटी प्रणाम करून अभिवादन करण्यात आले. 🙏

पाडळसरे धरण जन आंदोलन समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 

अमळनेर (जळगाव) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे आज शहरात उत्साहपूर्ण वातावरणात जयंती साजरी करण्यात आली.या

वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उभारण्यात आलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, नगरसेवक प्रताप साळी, सुनील पाटील, देविदास देसले, नरेंद्र पाटील, सुनील भोई, महेश पाटील, नारायण बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान ‘जय भीम’ तसेच ‘बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी समितीचे कार्यकर्ते आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

एकूणच, सामाजिक समता आणि न्यायाचा संदेश देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत ही जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.

 

अमळनेर नगरपालिकेत ‘शौर्य आणि विचारांचा जागर’; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व अग्निशमन दिन उत्साहात साजरा!

अमळनेर नगरपरिषद अग्निशमन दलाच्या वतीने आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि ‘राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन’ मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला. स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.

​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांची विशेष उपस्थिती लाभली. यासोबतच मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगरसेवक नाविद शेख, मोहन सातपुते, गुलाब पाटील, भरतसिंग परदेशी, योगराज सदाशिव, दीपक चौगुले, तुळशीराम हटकर, सोमचंद संदनशिव, सुधीर चौधरी, अनिल बेंडवाल, राहुल कंजर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी व दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

​महामानवाला अभिवादन आणि जवानांचा सन्मान

​कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी बाबासाहेबांच्या विचारांचे आणि राष्ट्रनिर्मितीमधील त्यांच्या महान योगदानाचे स्मरण करण्यात आले.

​१४ एप्रिल हा दिवस देशभर ‘अग्निशमन सेवा दिन’ म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त अमळनेर अग्निशमन दलाच्या जवानांच्या शौर्याचा, तत्परतेचा आणि निःस्वार्थ सेवाभावाचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर म्हणाले की,

​”अग्निशमन दल हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असते. कोणतीही आपत्ती असो, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे जवान जनसेवेसाठी धावून जातात. त्यांच्या या अजोड कार्याचा समाजाने नेहमीच सन्मान राखला पाहिजे.”

​अतिशय उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने समाजप्रबोधन आणि कर्तव्यभावनेचा एक नवा आदर्श घालून दिला.

test
casino utan svensk licens