नाशिक: ऑक्टोबर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष सागरानंद सरस्वती स्वामीजींचे नुकतेच महानिर्वाण झाल्याचे दुःखद वृत्त कळाले. त्यांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून पितृतुल्य व्यक्तिमत्व हरपले आहे, अशा शोकभावना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
शोक संदेशात छगन भुजबळ म्हणतात की,सिंहस्थ कुंभमेळ्याची खडान खडा माहिती असलेले एक जाणकार संत परंपरेतील ज्येष्ठ श्रेष्ठ महात्मा जुन्या पिढीतील एक तपस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून सागरानंद सरस्वती स्वामीजींची ओळख होती. अनेक दशके त्र्यंबकेश्वरात ते वास्तव्यास होते. माझ्या कार्यकाळातील दोन कुंभपर्व नियोजनात त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने त्यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले.
सागरानंद सरस्वती स्वामीजींनी धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अतिशय महत्वाचे योगदान दिलं. अतिशय महान कार्य करणाऱ्या श्री स्वामीजींचे भारतभरात मोठा शिष्य परिवार आहे. त्यांच्या निधनाने त्यांचा संपूर्ण भक्त परिवार पोरका झाला असून पितृतुल्य व्यक्तिमत्व हरपले आहे.
मी व माझे कुटुंबीय स्वामीजींच्या भक्तपरीवाराच्या दुःखात सहभागी असून त्यांच्या पवित्र स्मृतिस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात शेवटी म्हटले आहे.